युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ

युद्धजन्य परिस्थिती आणि मानसिक आरोग्य - डॉ अतुल ढगे, मानसोपचारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ 







                   सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आणि युद्धसदृश वातावरण अनेक नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करत आहे. टीव्ही वृत्तवाहिन्यांवर सतत युद्धाच्या शक्यतेबद्दल चर्चासत्रं, तज्ज्ञांचे अंदाज आणि काही वेळा अतिरंजित मथळ्यांनी भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यातच सोशल मीडियावरून सतत येणाऱ्या अफवा, भावनिक आवाहने, देशभक्तीचा अतिरेक, आणि काही वेळा द्वेषयुक्त पोस्ट्स या गोष्टी लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावर अधिकच दडपण टाकत आहेत. या सगळ्याचा सर्वसामान्य नागरिकांवर खोल परिणाम होत आहे. विशेषतः महिला, वयोवृद्ध, लहान मुले, मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती आणि आधीच तणावाखाली असणारे कर्मचारी वर्ग यांच्यावर अशा घटनांचा मानसिक आघात अधिक तीव्र होतो. सततच्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे चिंता वाढते, झोपेचा त्रास होतो, चिडचिड वाढते, आणि अनेकांना भविष्याची भीती वाटू लागते. काही लोक घराबाहेर निघायला घाबरतात, तर काहीजण वारंवार मोबाईलवर अपडेट्स पाहण्यात गुंतून मन:शांती हरवून बसतात. 
                                                                  या सगळ्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनते. युद्ध होईल की नाही हा प्रश्न बाजूला ठेवून, सध्याच्या क्षणात आपण आणि आपल्या कुटुंबियांचे मानसिक संतुलन कसे राखता येईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. अशा युद्धजन्य किंवा आपत्तीजन्य परिस्थितीत लोकांची मानसिक प्रतिक्रिया ही अतिशय नैसर्गिक, परंतु तीव्र असते. अचानक निर्माण झालेली अस्थिरता, भीतीचे वातावरण आणि संभाव्य धोका माणसाच्या मेंदूमध्ये 'फाइट-ऑर-फ्लाईट' ही जैविक प्रतिक्रिया कार्यान्वित करतो. याचा अर्थ असा की, मेंदू हे वातावरण धोकादायक असल्याचे ओळखतो आणि शरीर व मनाला सतर्क करतो. त्यामुळे चिंता, धडधड, घाम येणे, सतत काहीतरी वाईट घडेल या भीतीने ग्रासले जाणे असे बदल दिसून येतात. या परिस्थितीत लोक सहसा सतत बातम्या बघत राहतात. सोशल मीडियावरील अफवा, भावनिक पोस्ट्स आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप यामुळे लोक अधिक गोंधळात पडतात. माहितीपेक्षा अफवा जलद पसरतात आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. विशेषतः ज्यांचे नातेवाईक सैन्यात आहेत, सीमावर्ती भागात राहणारे लोक, लहान मुलं आणि ज्यांचं पूर्वीच्या अनुभवांमुळे मन अधिक संवेदनशील आहे. त्यांना ही परिस्थिती अधिक भावनिकदृष्ट्या त्रस्त करते. भविष्यात काय होईल याची अनिश्चितता, आर्थिक अस्थिरतेची शक्यता, आणि समाजातील बदललेली वागणूक यामुळे राग, चिडचिड, निराशा आणि झोपेचा त्रास होऊ लागतो. याशिवाय अनेक लोक मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यामध्ये इतके गुंततात की तेच त्यांच्या भावनांचे केंद्र बनते. या सततच्या माहितीच्या ओघामुळे माणूस अधिक थकतो, मानसिक ताण वाढतो आणि जगण्यावरचा विश्वास डळमळीत होऊ लागतो. 
                                                        अशा तणावपूर्ण आणि युद्धजन्य वातावरणात जसे काही गोष्टी करणं आवश्यक असतं, तसंच काही गोष्टी टाळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे — अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका. सोशल मीडियावर अनेक फेक संदेश, व्हिडीओ, आवाजाचे क्लिप्स फिरत असतात, जे अर्धवट किंवा चुकीची माहिती देतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे — सतत न्यूज चॅनेल्स, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर यावर युद्धासंदर्भात स्क्रोल करत राहू नका. ही सवय मनात चिंता अधिक वाढवते. निरर्थक विश्लेषण, भडक मथळे, अतिनाटकी भाष्यं यामुळे आपल्या भावना अस्थिर होतात. काही लोक अशा परिस्थितीत भावनिक भरात चुकीचे निर्णय घेतात – जसे की शहर सोडण्याचा विचार, गुंतवणूक काढून घेणे, शाळा बंद करणे, इ. हे निर्णय खूप विचारपूर्वक आणि शांत मनाने घ्यायला हवेत, झपाटून जाऊन नव्हे. याशिवाय दुसऱ्यांच्या घाबरण्याला खतपाणी घालू नका. "काहीतरी मोठं होणार" असे वाक्य वापरणं भीती पसरवणं ठरतं. मुलांसमोर घाबरलेली भाषा वापरणं, अति भावनिक वागणं टाळा. त्यांना मानसिक आधार द्या, उलट सावरण्याचं बळ द्या. काही लोक आपल्या शंका, भीती, समज गैरसमज यांचं ओझं इतरांवर टाकतात. 
                                         काही गोष्टी जाणीवपूर्वक आणि नियमितपणे करणे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. सर्वप्रथम, केवळ विश्वासार्ह माहितीच्या स्रोतांकडे लक्ष देणे हे अत्यावश्यक आहे. DD News, AIR, आणि सरकारचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स हीच खरी माहिती पुरवतात. अफवांच्या ओघात न वाहता नेमकी आणि खात्रीशीर माहिती घेणं तुमचं मन शांत ठेवायला मदत करतं. दुसरी गोष्ट म्हणजे नियमित दिनचर्या टिकवणे. सकाळी उठणे, जेवणाची वेळ, कामाची योजना आणि झोपेची वेळ या गोष्टी सुरळीत ठेवणं मनाला स्थिरता देतं. दिवसातून एखाद-दोन वेळा बातम्या बघा; सतत मोबाईल, टीव्ही स्क्रोल करून मन अस्थिर करू नका. ध्यान, श्वसन सराव आणि योग या गोष्टी मन आणि शरीर दोघांनाही स्थिरता देतात. दररोज १०-१५ मिनिटांचा श्वसन सराव जरी केला तरी तणाव लक्षणीयरित्या कमी होतो. आपल्या भावना कोणाशी तरी शेअर करा. मित्र, नातेवाईक, किंवा समुपदेशक — कोणालाही आपल्या मनातली घालमेल सांगणं हलकं करतं. मुलांसोबत वेळ घालवा, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना घाबरवणं नव्हे, तर धीर देणं गरजेचं आहे. त्यांचे प्रश्न शांतपणे ऐकून समजावून सांगणं त्यांना सुरक्षिततेचा अनुभव देतं. शेवटी, वयोवृद्ध व मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तींना विशेष आधार द्या. त्यांना वेळ द्या, त्यांच्या भावना ऐका, आणि त्यांना एकटे वाटणार नाही याची काळजी घ्या. 
                                                        अशा काळात तीव्र चिंता विकार (Acute Anxiety Disorder) उद्भवू शकतो. यात व्यक्तीला सतत भीती वाटते, मन अशांत राहतं, आणि काही वेळा धडधड, घाम येणे, श्वास घेण्यात अडचण अशी शारीरिक लक्षणं दिसतात. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) ही आणखी एक गंभीर प्रतिक्रिया असू शकते. विशेषतः ज्यांनी आधी युद्ध, हिंसा, आघात याचा अनुभव घेतला आहे, त्यांच्यामध्ये जुन्या आठवणी त्रासदायक पद्धतीने उफाळून येऊ शकतात. त्यांना कधीही अचानक रडू येणं, फ्लॅशबॅक येणं, आवाजांनी घाबरणं अशा लक्षणांनी ग्रासलं जाऊ शकतं. झोपेचे विकार अत्यंत सामान्य आहेत. सतत चिंता, अस्थिरता, आणि भीतीमुळे अनेकांना झोप लागत नाही, सतत दुःस्वप्नं पडतात किंवा मध्यरात्री जाग येते. भयगंड (Phobia) निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, सायरनचा आवाज ऐकून भीती वाटणे, विमान किंवा बॉम्बचा आवाज ऐकून हादरणे इत्यादी. मानसिक थकवा आणि नैराश्य देखील दिसून येते. लहान मुलांमध्ये वर्तनातील बदल घडतात. काही मुलं खूप गप्प होतात, काही चिडचिड करू लागतात, शाळेतील कामगिरीत घसरण दिसते, काही रात्रभर आई-वडिलांना बिलगून राहतात. ही सर्व लक्षणं हे दर्शवतात की मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे आणि याची योग्य ती दखल घेणे अत्यावश्यक आहे. वेळेत समुपदेशन व उपचार झाल्यास बरे होणं शक्य असतं. 
                                             युद्धजन्य किंवा तणावपूर्ण प्रसंगात आपणच स्वतःचं मानसिक संतुलन राखण्यासाठी काही उपाय योजले पाहिजेत. परिस्थिती बदलू शकत नसेल, तरी आपल्या प्रतिक्रिया आणि विचार मात्र आपण नियंत्रित करू शकतो. सर्वात प्रभावी पद्धतींपैकी एक म्हणजे ‘ग्राउंडिंग तंत्र’ किंवा माईंडफुलनेस. यात आपण स्वतःला सध्याच्या क्षणात आणण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ — आपल्या आसपासच्या ५ गोष्टी बघा, ४ गोष्टी स्पर्श करा, ३ गोष्टी ऐका, २ गोष्टींचा वास घ्या आणि १ गोष्टीची चव अनुभवा. ही पद्धत मनाला ‘आता आणि इथे’ या क्षणात स्थिर करते, भीतीचे विचार थोपवते आणि वास्तवात पुन्हा आणते. दुसरा प्रभावी उपाय म्हणजे ‘ब्रीदिंग एक्सरसाईज’ — म्हणजेच खोल, संथ श्वास घेणे आणि सोडणे. मनातल्या भावना आणि विचार लिहून काढा. कधी कधी भावना फक्त बोलण्याने किंवा लिहिण्यानेच हलकं वाटू लागतं. परिवार आणि मित्रांशी सकारात्मक संवाद साधणं खूप उपयुक्त ठरतं. एकमेकांशी संवाद साधल्याने भावनिक आधार मिळतो. या सर्व उपायांनी आपलं मन अधिक स्थिर, स्पष्ट आणि सकारात्मक बनतं. हीच मानसिक शांतता तुम्हाला या अशांततेत सावरण्याची खरी ताकद देऊ शकते. 
                                                            काही वेळा मानसिक तणाव इतका वाढतो की साध्या युक्त्या, मित्रांचा आधार किंवा आत्मनियंत्रण पुरेसं राहत नाही. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेणं ही कोणतीही कमजोरी नव्हे, तर एक शहाणपणाची आणि धाडसाची गोष्ट असते. चिंता आणि विचारांच्या माऱ्यामुळे रात्रभर जागं राहणं, झोप लागली तरी पुन्हा पुन्हा जाग येणं. ऑफिस, घरकाम, मुलांशी संवाद, बाहेर जाणं अशा साध्या गोष्टी करतानाही प्रचंड भीती वाटणे. भीतीमुळे दैनंदिन कामकाजात अडथळे येणे.– जसे की हृदयाचे ठोके वेगाने वाढणे, थंडी न लागता घाम येणे, घशाला कोरड पडणे, धाप लागणे अशी शारीरिक लक्षणं जाणवणं. तीव्र निराशा व आत्मघातकी विचार मनात येणे हे गंभीर लक्षण आहे आणि अशा वेळी तातडीने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक असतं. जुनं नैराश्य, भीती, आक्रमकता, आक्रमक वर्तन किंवा अति-शंका पूर्वीच्या मानसिक आजाराची लक्षणं पुन्हा सुरू होणे. सतत गप्प राहणे, खेळण्यात रस नसणे, अचानक चिडचिड करणे, भीती वाटणे, आई-वडिलांना चिकटून राहणे असे मुलांच्या वर्तनात तीव्र बदल होणे. या लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणं दिसू लागली, तर विलंब न करता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्यावर उपचार हे अगदी सहज, परिणामकारक आणि उपलब्ध आहेत. गरज आहे फक्त ते स्वीकारण्याची आणि योग्य वेळी मदत मागण्याची. स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणं, यातच खरा शौर्य आहे. 
                                   अशा तणावपूर्ण आणि संकटग्रस्त काळात समाज म्हणून आपली भूमिका केवळ स्वतःला सांभाळण्यापुरती मर्यादित नसते, तर आजूबाजूच्या लोकांना समजून घेणं, त्यांना आधार देणं, हे सुद्धा आपलं नैतिक कर्तव्य ठरतं. संकटाच्या काळात लोकांना “सल्ला” न देता “समजून घेणं” हे अधिक प्रभावी ठरतं. जेव्हा एखादा माणूस भीती, गोंधळ किंवा नैराश्यात असतो, तेव्हा त्याला कारण शोधन किंवा तात्कालिक उपायांची गरज नसते — त्याला गरज असते कुणी शांतपणे ऐकावं, समजून घ्यावं आणि भावनिक आधार द्यावा. त्यामुळे संवाद करताना "हो, तुझी भीती समजतेय", "मी तुझ्यासोबत आहे" असे वाक्य वापरणं उपयोगी ठरतं. घाबरलेल्या लोकांना सत्य आणि अधिकृत माहिती द्या. मुलांना सुरक्षिततेचा विश्वास द्या. त्यांच्या शंकांना फेटाळून न लावता सोप्या आणि शांत भाषेत उत्तर द्या. त्यांना सांगा की आई-बाबा त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांना सुरक्षित ठेवतील. वृद्ध व्यक्तींना समजून घ्या. त्यांना आपली चिंता, जुने अनुभव, भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. अशावेळी त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांचे अनुभव ऐका, आणि त्यांना एकटे वाटणार नाही याची काळजी घ्या. समाजमाध्यमावर सकारात्मक संदेश शेअर करा. फेक न्यूज, द्वेषयुक्त विधानं, घाबरवणारे व्हिडीओ टाळा. त्याऐवजी आश्वासक माहिती, प्रेरणादायक विचार, शांती टिकवणारे संदेश पसरवा. कोणीतरी खूप अस्वस्थ, गप्प, असहाय्य वाटणारा असेल तर त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करा. एक चांगला श्रोता, समजून घेणारा माणूस, आणि आधार देणारा मित्र प्रत्येकजण होऊ शकतो. 
                                            युद्धजन्य तणावाच्या काळात समाजातील काही गट हे अधिक संवेदनशील आणि असुरक्षित बनतात — विशेषतः लहान मुलं आणि आधीपासून मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती. या सर्व गटांची मानसिक अवस्था अधिक लवचिक नसते, त्यामुळे त्यांच्या भावनिक गरजांकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. लहानग्यांचं मन हे कोवळं असतं आणि त्यांचं वास्तव समजून घेण्याचं कौशल्य मर्यादित असतं. टीव्हीवर सतत युद्ध, बॉम्बस्फोट, मृत्यू, सैनिकांचे शव असे दृश्य पाहून त्यांच्यावर खोल मानसिक परिणाम होऊ शकतो. ते अचानक शांत होतात, भीतीने भरतात, किंवा उलट चिडचिड करू लागतात. म्हणूनच त्यांच्याशी सतत संवाद साधणं आवश्यक आहे. त्यांना विचारू द्या, आणि त्यांच्या प्रश्नांना शांतपणे, वयाच्या योग्य पातळीवर उत्तर द्या. मानसिक आजार असलेले लोक: जे आधीच नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर अशा समस्यांनी ग्रस्त आहेत, त्यांचं मानसिक संतुलन अशा युद्धसदृश घटनांमुळे अधिक डळमळीत होऊ शकतं. त्यांच्या नियमित औषधोपचाराची सातत्याने काळजी घ्या. औषध चुकू नये याची दक्षता ठेवा. त्यांचे मूड, बोलणं, झोप, खाणं, किंवा वर्तन यामध्ये जर काही बदल दिसला, तर त्वरित मानसोपचारतज्ज्ञाशी संपर्क साधा. 
                                                 संकटाच्या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं ही फार मोठी मानसिक शक्ती मानली जाते. युद्धसदृश किंवा तणावपूर्ण वातावरणात भावना प्रबळ होतात, परंतु त्याचवेळी विवेकबुद्धी टिकवून ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरतं. देशासाठी गर्व असावा, पण भावना ताणावात बदलू देऊ नका. देशभक्ती ही उर्मी आहे, भावना आहे — ती प्रेरणा देते. पण ती जर राग, द्वेष, किंवा असहिष्णुतेत बदलली, तर ती समाजाच्या एकतेला धोका ठरते. स्वतःच्या मनाचे निरीक्षण करा. आपण काय विचार करत आहोत, कोणत्या भावना सतत येत आहेत, आपण कुणावर राग व्यक्त करत आहोत, अशा प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचारा. ही ‘स्व-निरीक्षण’ प्रक्रिया आपल्याला मानसिक संतुलन राखायला मदत करते. मदतीची गरज असेल तर मागण्याची लाज बाळगू नका. मानसिक अस्वस्थता ही आजारासारखीच गोष्ट आहे. जसे ताप आला तर डॉक्टरकडे जातो, तसंच तणाव, चिंता किंवा नैराश्य वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेणं ही शहाणपणाची गोष्ट आहे. अशांततेमध्येही ‘शांतता’ शिकवणारा व्हा. जर तुम्ही स्थिर, शांत आणि समजूतदार आहात, तर तुमच्यामुळे अनेक जण सावरू शकतात. तुमचं वागणं, बोलणं आणि प्रतिसाद हे इतरांना आधार देऊ शकतात. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे परिस्थिती नाकारणं नव्हे, तर तिचा सामना सन्मानाने आणि समजूतदारपणे करणं. हेच दृष्टिकोन आपल्या कुटुंबात, समाजात आणि पर्यायाने देशात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. 
                                                                मानसिक शांतता ही केवळ आपल्याला आतून मजबूत बनवत नाही, तर ती आपल्या कुटुंबीयांना आधार देते, समाजात समजूतदारीचं वातावरण निर्माण करते आणि एक राष्ट्र म्हणून आपली एकजूट बळकट करते. युद्धसदृश किंवा संकटाच्या क्षणी आपल्या भावनांचं संयमित आणि शहाणपणानं व्यवस्थापन करणं, हीच खरी देशसेवा आहे. देशासाठी रणांगणावर लढणं हे एका प्रकारचं शौर्य आहे, पण घरामध्ये किंवा मनात शांतता राखणं, समजूतदारपणानं वागणं हे सुद्धा तितकंच मोठं योगदान ठरतं. संकटं ही कायमची नसतात. काळ पुढे जातो, परिस्थिती बदलते, पण त्या काळात आपण काय शिकलो, कसं सावरलो, आणि आपल्या मानसिक आरोग्याची किती काळजी घेतली — हेच आपल्या भूतकाळाचं खऱ्या अर्थानं मोजमाप असतं. आपलं मन जर स्थिर आणि सकारात्मक असेल, तर आपण कोणत्याही वादळाचा सामना करू शकतो. आपण आपल्या मनाला सांभाळलं, आपल्या कुटुंबाला आधार दिला, आणि समाजात शांततेचा संदेश दिला — तर आपणही एक "शांततेचा सैनिक" ठरतो.

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस

Celebrating National Orgasm Day 2024: Understanding the Importance of Sexual Wellness